Monday, 14 April 2025

Ambedkar Jayanti Wishes 2025 :

उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे! आंबेडकर जयंतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; महामानवाला करा वंदन, पाठवा 'हे' मेसेजेस



बाबासाहेबांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करतात. 1891 साली या दिवशी बाबासाहेबांचा जन्म झाला.

Ambedkar Jayanti Wishes 2025 quotes and messages send to your loved ones keep status of this Ambedkar jayanti wishes in marathi Ambedkar Jayanti Wishes 2025 :

उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे! आंबेडकर जयंतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; महामानवाला करा वंदन, पाठवा 'हे' मेसज


भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
|| जय भीम ||

नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!



राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा,
|| जय भीम ||


निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा...!
|| जय भीम ||



मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची तू
जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची...
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!


ज्याने सर्वांना समजले एक समान,
असे होते आमचे बाबा महान...
सर्वांना स्वतंत्र आणि आनंदाने जगायला शिकवले भीमाने,
स्वतंत्र आणि समानतेचा नारा दिला भीमाने…
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!



जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


बाबांच्या लेखणीने लिहिलं भविष्य आमचं,
दिशा दिली अन्यायाविरोधात चालण्याचं,
वेळ  बदलेल, काळही बदलेल
पण जय भीमचा नारा कायम गगनात घुमेल...
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!


बाबासाहेबांनी दिलं आम्हाला विचारांचं बळ,
अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं अढळ धैर्य,
जगाला सांगितलं आम्हीही आहोत समान,
स्वाभिमानाने जगायला दिला आत्मसन्मान...!
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!


आजचा दिवस आहे गौरवाचा,
उगवला एक तेजस्वी सूर्य समाजहितासाठी लढणारा,
ज्याने दिला संविधानाचा अनमोल वारसा,
देशाला दिला नव्या भविष्याचा आधारसा...
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..

Friday, 23 February 2024

संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर



गाडगेबाबा कोणत्याही शाळेत शिकले नाहीत तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर उच्च विद्याविभूषित. पार परदेशातून शिकून आलेले. असा स्पष्टपणे दिसणारा विरोधाभास असतानाही या दोन महामानवांमध्ये मात्र कमालीचे सख्य होते. यामागे कारणीभूत होता तो समाजाविषयीचा जिव्हाळा, तसेच समाजाच्या शोषणाला कारणीभूत अशा अनिष्ट प्रथा-परंपरांना नाहीसे करण्याची तगमग. दीन-दुबळ्यांच्या कल्याणासाठी राबणारे हे दोन्ही महामानव समाजप्रबोधनासाठी अनेकदा एकत्र आले आहेत. जाती व्यवस्थेतील उच्च-नीच भाव हाच समाजाच्या सर्वांगीण शोषणासाठी कारणीभूत आहे याविषयी दोघांचेही एकमत होते. सर्व प्रकारचे शोषण संपून समताधिष्ठित समाज निर्माण व्हावा यासाठी जन प्रबोधन आवश्यक आहे, हे दोघांनाही मान्य होते. आपल्या प्रबोधनाचे माध्यम म्हणून कीर्तन या लोककलाप्रकाराचा स्वीकार गाडगेबाबांनी केला, तर भाषणे, चर्चा, आंदोलने, राजकारण. धर्मकारण इ. माध्यमे आपल्या उद्दिष्टपूर्तीकरिता बाबासाहेबांनी वापरलीत. सामाजिक व आर्थिक सत्ता सर्वसामान्यांच्या हाती आली पाहिजे असे दोघांनाही वाटत होते. त्यामुळे स्वाभाविकपणे दोघेही एकमेकांच्या कार्याला पूरक असेच उपक्रम करीत राहिले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा वयाने पंधरा वर्षे मोठे असूनही आपल्या मोठेपणाचा बडेजाव कधीही गाडगेबाबांनी दाखविला नाही. उलट बाबासाहेबांच्या विद्वत्तेविषयी आणि कार्याविषयी गाडगेबाबांना अतीव आदर होता. तसेच बाबासाहेबांचेही होते. गाडगेबाबा अशिक्षित आहेत हे त्यांनी कधीही आपल्या वागण्यातून दिसू दिले नाही. उलट ते अगदी खाली बसून त्यांच्या कीर्तनामध्ये सहभागी होत असत. आपल्या कार्याविषयी एकमेकांचा सल्ला व मार्गदर्शन ते घेत असत. आपल्या कीर्तनामधून गाडगेबाबा बाबासाहेबांविषयी आदराने बोलत तसेच त्यांच्या विचार व कार्याचा आवर्जून

उल्लेख करीत असत. गाडगेबाबांचे कीर्तन मुंबईत आहे असे कळले की, बाबासाहेब आवर्जून त्यांचे कीर्तन ऐकायला जात असत आणि आपल्या मित्रांना तसेच सहकाऱ्यांनाही त्यासाठी प्रोत्साहित करीत असत. गाडगेबाबांच्या कीर्तनातून आपणास काय शिकायला मिळेल याची उत्सुकता त्यांना होती. एकदा मुंबईच्या भायखळा येथील मार्केटमध्ये बाबांचे कीर्तन होते. वि.मा.दि. पटवर्धन यांनी याविषयीची आपली आठवण लिहून ठेवली आहे. ते म्हणतात, 'डॉ. आंबेडकरांच्या आग्रहाखातर एकदा त्यांच्याबरोबर विविध वृत्तपत्रांचे संपादक आणि मी बाबांच्या कीर्तनाला गेलो. भायखळा मार्केट जे नेहमी घाणेरडे असायचे ते आज लख्ख होते.' सालं या म्युनिसिपालटीच्या लोकांना कीर्तनासाठी पटांगण साफ करायला बरं सुचत नाही तर के.इ.एम.चं आवार बघा कधी त्याला झाडू लागेल तर शपथ.' रामभाऊ आपल्या स्वभावानुरूप चरफडले आणि रुमाल टाकून त्यावर बसणार, तोच बाबासाहेबांनी तो रुमाल ओढून घेतला आणि म्हणाले,' रामभाऊ, हे मार्केट बाबांनी स्वतःच्या हातांनी झाडून धुवून काढलं. बसा नीट आरामात. बाबाच्या कीर्तनात बाबासाहेब खालीच बसायचे आणि म्हणायचे,' जेथे गाडगेबाबा तेथे घाण असूच शकत नाही.' बाबासाहेबांमुळे त्यांचे सहकारीही खालीच बसून गाडगेबाबांचे कीर्तन ऐकत असत.


कीर्तन सुरू होताच तटणीस नावाच्या एका श्रोत्याने बाबांना विचारले, महाराज, एक विचारू का ?' त्यावर गाडगेबाबा म्हणाले,' इचारा मायबाप ! पन मले महाराज म्हणू नका. मी आपलं लेकरू हाय. बोलविते धनी बसले तुमच्या पलीकडे, तेच आहेत खरे महाराज, गरीब लोकांसाठी. आपल्या समाजासाठी लढणारे महाराज तुमच्यासाठी आधीच जमिनीवर खाली बसून माह्य कीर्तन आयकून राहिले.' असे म्हणून त्यांनी बाबासाहेबांकडे बोट दाखविले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की, बाबासाहेब खाली बसून गाडगेबाबांचे कीर्तन ऐकत होते.


गाडगेबाबांना बाबासाहेबांविषयी असलेला आदर अनेक प्रसंगांमधून दिसून येतो. बाबासाहेबांविषयी कुणी अनादर व्यक्त केला की, गाडगेबाबा अस्वस्थ होत असत. बाबासाहेबांचा जीवनप्रवास, संघर्ष, शिक्षण व इतर कार्य याविषयी आपल्या कीर्तनांमधून ते नेहमी सांगत असत. त्याचबरोबर त्यांच्या नावाचा जयघोष आपल्या श्रोत्यांना करायला लावीत असत. १९४२ मध्ये असाच एक प्रसंग घडला. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे तात्यासाहेब पवार यांच्या बंगल्यासमोर आयोजित कीर्तनाच्या वेळी भारतातील अनेक महामानवांच्या कार्याविषयी महती सांगताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे महत्व सांगून कीर्तन संपताना' बोलो डॉ. बाबासाहेब आंबेडकर की..' असा जयघोष केला. परंतु श्रोत्यांकडून त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी अस्वस्थ होऊन बाबा पुन्हा बाबासाहेबांच्या जीवनप्रवास, कार्य व संघर्षाविषयी पोटतिडकीने सांगू लागले. बाबांच्या या तळमळीचा योग्य तो परिणाम होऊन त्यांनी पुन्हा बाबासाहेबांचा जयघोष केल्यावर लोक त्यांच्यामागून मोठ्या आवाजात 'जय' म्हणू लागले. सगळीकडे झालेल्या बाबासाहेबांच्या प्रचंड जयघोषाने सारा आसमंत निनादला. जसा गाडगेबाबांना बाबासाहेबांविषयी आदर होता, तसाच बाबासाहेबांनाही गाड्ङ्गेबाबांबद्दल होता,


एकदा मुंबईच्या नरे पार्कात डॉ. आंबेडकरांचे भाषण सुरू होते. लोक शांतपणे बाबासाहेबांचे भाषण ऐकण्यात तल्लीन झाले असतानाच गाडगेबाबांच्या गाडीचा खडखड आवाज आला. तो ओळखीचा आवाज ऐकून बाबासाहेबांनी आपले भाषण थांबविले. लोकांना कळेना की, बाबासाहेबांनी आपले भाषण का थांबविले म्हणून. मंचाखाली गाडगेबाबा आपल्या हातात हार घेऊन उभे होते व बाबासाहेबांना खाली येण्याची विनंती करीत होते. ते पाहून बाबासाहेब त्यांना म्हणाले,' तुम्हीच वर या.' त्यावर गाडगेबाबा म्हणाले,' साहेब तुम्ही खाली या.' बराच वेळ असंच चालू राहिलं. श्रोत्यांनाही हे काय चालू आहे हे कळेनासे झाले. शेवटी बाबासाहेब मंचावरून खाली उतरले. गाडगेबाबांनी त्यांच्या गळ्यात हार घातला. दोन्ही महामानव अशारितीने जाहीरपणे एकमेकांना भेटले.

गाडगेबाबा यावेळी बाबासाहेबांना म्हणाले की,' मंचावर येन्याएवढा मी काही मोठा नाही.' लोकांनी हे शब्द ऐकले. बाबासाहेब पुन्हा भाषण देण्याकरिता मंचावर जायला निघाले, तेव्हा मंचावर बसलेले लोक हळुहळू मंचावरून खाली उतरले. शेवटी मंचावर एकटेच बाबासाहेब होते. या दरम्यान गाडगेबाबा तेथून निघून गेले होते. बाबासाहेबांनी पुन्हा आपल्या भाषणास सुरुवात केली, अशी दोघांमधील मैत्री अतूट होती.


मुंबईच्या बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये ८ नोव्हेंबर १९५६ रोजी झालेल्या कीर्तनात डॉ. आंबेडकरांच्या शिक्षणाची गोष्ट सांगताना गाडगेबाबा म्हणाले होते की, 'विद्या केवढी मोठी गोष्ट आहे. डॉ. आंबेडकर साहेब यांच्या पिढ्यान पिढीनं झाडू मारायचं काम केलं. त्याइच्या वडीलाले बुद्धी सुचली अन डॉ. आंबेडकर सायबाले शाळेत टाकलं. आंबेडकर सायबानं काही लहानसहान कमाई नाही केली. त्यांनी घटना केली, हिंदुस्थानची घटना केली. अन तेच शाळेत जाते ना, अन शिकते ना, तर झाडू मारनंच त्याईच्या कर्मात होतं. विद्या मोठं धन आहे. जेवणाचं ताट मोडा, बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या, मोडक्या घरात राहा. पण मुलाले शिक्षण दिल्याविने सोडू- नोका !'


डॉ. आंबेडकर ज्या समाजातून आले होते, तो समाज हिंदू धर्मातील अस्पृश्य मानला गेलेला समाज होता. म्हणून मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी, हिंदू म्हणून मरणार नाही; अशी प्रतिज्ञा त्यांनी नाशिक जिल्ह्यातील येवले येथे १९३५ ला जाहीर कार्यक्रमात केली व हिंदू धर्म त्यागाची घोषणाही केली. त्यानंतर अनेक धर्माचे लोक त्यांना भेटून आपल्या धर्मात येण्याची विनंती करू लागले. या दरम्यान डॉ. आंबेडकर गाडगेबाबांच्या भेटीस आवर्जून गेले होते. त्यांच्याशी धर्म स्वीकारण्याविषयी त्यांनी सल्ला-मसलत केली. बाबांना भेटल्यावर डॉ. आंबेडकर म्हणाले,' आमचं आपल्याशी काम होतं.' त्यावर बाबा म्हणाले,' बाबासाहेब आपणास तरास झाला. आपण किती तरास घेता. भारताची घटना बनवली, चहूकडे विद्येचा प्रकाश पाडला, दलितांसाठी रात्रंदिवस खटपट करून राहिले. धन्य...आपले माता-पिता !' हे ऐकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना हात जोडून म्हणाले बाबा आपण माझे गुरू आहात. एका बाबतीत मला आपला सल्ला पाहिजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या वाक्यावर बाबा म्हणाले,' बोला ! मले अडाण्याले काय समजते ?' बाबांच्या या वाक्यावर डॉ. आंबेडकरांनी आपल्या हिंदू धर्म त्यागाच्या निर्णयाविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे नव्या धर्माच्या स्वीकाराविषयीही त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी बाबा त्यांना म्हणाले,' मले अडाण्याले काय धर्माचं ज्ञान ? मी अडाणी धोबी !'


बराच काळ त्यांच्यात विचारांची देवाण-घेवाण होत होती.


थोड्या वेळाने बाबा म्हणाले,' डॉक्टर साहेब, मी अडाणी माणूस ! तुम्ही शिकले-सवरले हायेत.लय बुकं वाचली हायेत. तुम्हाले आपल्या समाजाची दुःख दैना माहित आहे. तुम्ही जो निर्णय घ्यान तो बेसच अशीन. सगळी पद दलित जमात तुमच्या मागे आहे. तुम्ही रस्ता दाखवान त्या रस्त्यानं ते सगळे येतीन. त्याईची तुमच्यावर श्रद्धा हाये. तुमच्या एका अक्षरापायी हे लोक जीव टाकतीन, त्याईले भलत्या वाटेनं नेऊ नोका. बुद्ध अन त्याचा धरम माणुसकीचा धरम हाये. आम्ही बाप्पा वारकरी धर्माचे. ह्याच धरम माणुसकीनं साऱ्या समजाले पुढं नेईन. तुम्ही करान थे बराबरच करान, सारा समाज तुमच्या पाठीशी हाये.'


या संवादामधून गाडगेबाबांनी बौद्ध धर्माच्या स्वीकाराची सूचना बाबासाहेबांना दिली होती हे दिसून येते. दोघांच्या विचारांमध्ये कमालीचे साधर्म्य होते. कोणतीही औपचारिकता न पाळता दोघांनी आपापली मने एकमेकांसमोर खुली केलीत.


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारताचे पहिले मंत्रिमंडळ गठित केले गेले. त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदेमंत्री म्हणून समावेश झाला. त्यानंतरही मुंबईत बाबा आले असे कळले की, व्यस्त असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाबांना भेटायला येत असत. प्रकृती बिघडल्यामुळे १४ जुलै १९५१ रोजी गाडगेबाबा मुंबईला दादर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखत

झाले होते. महानंद स्वामी यांच्याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ही माहिती कळली. त्याच दिवशी संध्याकाळी बाबासाहेबांना दिल्लीला जायचे होते. त्यासाठी ते बॉम्बे सेन्ट्रल रेल्वे स्टेशनवर पोहोचले सुद्धा होते. परंतु, बाबांच्या प्रकृतीची माहिती कळल्यावर त्यांनी आपला बेत बदलविला व गाडगेबाबांच्या भेटीसाठी दवाखान्यात पोहोचले. बाबांना भेट देण्यासाठी त्यांनी सोबत दोन घोंगड्या खरेदी केल्या होत्या. गाडगेबाबा कुणाकडूनही कोणतीही भेट स्वीकारीत नसत. पण बाबासाहेबांनी प्रेमाने आणलेल्या घोंगड्या मात्र त्यांनी स्वीकारल्या. त्यावेळी ते म्हणाले,' डॉक्टर साहेब तुम्ही कशाला आले ? मी एक फकीर, तुमचा एक एक मिनिट महत्वाचा आहे. तुमचा अधिकार किती मोठा आहे.' बाबांचे ते म्हणणे तन्मयतेने ऐकणारे बाबासाहेब म्हणाले,' बाबा माझा अधिकार दोन दिवसांचा उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे.'


याप्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांमधून सुखद अश्रू तरळले होते. इतका निवांतपणा पुन्हा लाभणार नाही आणि अशा भेटी होणार नाहीत, याची जाणीव दोघांनाही झाली असावी. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील हे उपस्थित होते. निघताना बाबासाहेबांनी बाबांना तब्येतीला जपा, धर्मशाळा आणि इतर कामाची काळजी करू नका; ते केव्हाही पुढे करता येईल. आपण विश्रांती करा असे बाबांना आवर्जून सांगितले. याच भेटीमध्ये बाबांनी डॉ. आंबेडकरांना पंढरपुरातील चोखामेळा धर्मशाळा पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक कामासाठी दिली आणि पंढरपूर धर्मशाळेचे दानपत्र व धर्मशाळेच्या खात्यात असलेली एकूण १५००० रुपये इतकी रक्कम सुपूर्द केली. निरोप घेताना डॉ. आंबेडकरांना गाडगेबाबा म्हणाले की, आपली लय आधी भेट झाली असती तर धर्मशाळा काढण्याऐवजी शिक्षण शाळा काढल्या असत्या. पण आता हे काम तुम्हीच करा. मला हे उशिरा समजले की, अशा लय शाळा अन कालिजाची गरज आहे. बाबांच्या मनातील शिक्षण प्रसाराची इच्छा या निमित्ताने पूर्ण झाली. अंगात ताप असतानाही गाडगेबाबांनी कागदपत्रांवर अंगठा दिला, असे या घटनेविषयी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी

लिहून ठेवले आहे. शिक्षणामुळेच माणसाला मोठेपण मिळते है बाबासाहेबांवरून बाबांनी जाणलं होतं. डॉ. आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्यामध्ये वैचारिक साम्य होते हे यावरून दिसून येते.


गाडगेबाबांचा मुलगा गोविंद कुत्रा चावल्यामुळे झालेल्या विषबाधेने मरण पावला होता. तशीच त्यांची आईही मरण पावली होती. त्यावेळीही जेवढे दुःख बाबांना झाले नव्हते, तेवढे बाबासाहेबांच्या मृत्यूमुळे झाले होते. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब गेले हे कळताच बाबा धाय मोकलून रडले होते. त्यांचे रडणे पाहून सोबतच्या लोकांना काही कळेना तेव्हा बाबा म्हणाले,'अरे आज तुमचा आमचं बाप या जगात राहिला नाही. अरे तुम्ही आम्ही पोरके झालो रे !' त्यानंतर बाबांची प्रकृती ढासळत गेली आणि अवघ्या चौदा दिवसांमध्ये त्यांचीही प्राणज्योत मालवली. २० डिसेंबर १९५६ रोजी बाबा जे जग सोडून गेले. अमरावतीला येताना वलगाव येथील पेढी नदीच्या पुलावर मोटारीत असतानाच त्यांना मृत्यू आला....

-उपासक 


Tuesday, 6 February 2024

'रमाई'.. स्वाभिमानी महिलेची संस्कारगाथा


'रमाई' स्वाभिमानी महिलेची संस्कारगाथा
🌸🌸
✍️



06/02/2024

असं म्हंटल्या जाते की, जगातील सर्वच पराक्रम आईच्या कुशीतच जन्म घेत असतात. आई हा शब्द कोणी शिकवावा लागत नाही तर तो सहजच मुखातून बाहेर पडतो. चालताना अचानक पायाला ठेच लागली तर मुखातून 'आई' हाच शब्द बाहेर पडतो. तर असे हे हृदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवण्यासारखे दोन शब्द म्हणजे 'आई'.
आई कुणाचाही असो तिच्या मुठीत अख्ये विश्व सामावलेले असते. आई या शब्दातच वात्सल्याची तहान आहे. मायेची उब आहे.प्रेमाची पाखर आहे. कोमेजलेल्या मनांना जीवन देणारा एक आधारवड आहे. आईची थोरवी सांगण्यासाठी शब्द भांडार ही अपुरेच ठरते. मनात उठणारे वादळ आईच्या मांडीवर डोके ठेवले की अगदी शांत होते. संकटात असतांना आईचा प्रेमाचा हात डोक्यावरून फिरला की मनास अपूर्व शांतता लाभते. आईच्या प्रेमाला व्यवहाराची तुलना माहित नसते. प्रत्येक आई आपल्या मुलांना सुसंस्कारित करित असते. तिची मुलांकडून एकच अपेक्षा असते आपली मूले मनाने, गुणाने व पराक्रमाने मोठी व्हावीत.

आणि म्हणूनच आपण आज आपण आपल्या सर्वांच्या 'आई' म्हणजेच 'रमाई' यांची महती जाणून घेऊ.रमाई ही केवळ एक व्यक्ती नाही, एखादे पात्र नाही, एक स्त्री ही नाही तर रमाई म्हणजेच 'मातृत्वाचे महाकाव्य' होते.
लहानपणी कोणाचेही आईबाप मरू नये असे म्हणतात. त्यामुळे मायेचा किनारा लाभत नाही आणि अशी ही मूले रानोमाळ भटकतात. वणंदगावच्या भिखूजी धोत्रे आणि रूखमा  यांच्या पोटी 7 फेब्रुवारी 1898 ला रमाचा जम्म झाला. रमाचे पाळण्यातील नाव भागेरथी. पण सारे तीला रमा च म्हणत. रूखमा तीला रामी म्हणून हाक मारित असे. रामी खूप कष्टाळू.. गौरा आणि शंकर ही रमाची भावंडे. गरीबीत, कष्टात पण समाधानात रमाचे जीवन जगणे सुरू होते. भिकू दाभोळ बंदरात माशाच्या टोपल्या वाहून नेण्याचे काम करित असे. टोपल्या वाहून वाहून त्यांना छातीचे दुखने वाढते. तशातच अर्धांगवायूचा झटका येतो. आणि याच धक्यामूळे रूक्मिनीसुध्दा आजारी पडते. आणि जगाचा निरोप घेते काही दिवसातच भिकू सुध्दा जगाचा निरोप घेतात आणि गौरा, शंकर, रमा ही मूलं आईबापाविणा पोरके होतात. रामी सुन्न होते. तीचे बालपन करपते. आईवडिलांच्या मृत्युनी अंतर्मुख होऊन लहान वयातच ती अजाण बालिका सुजाण बनते. 'लहानपणी खरचं कुणाचेही आईबाबा मरू नयेत.'धोत्रे काका आणि गोविंदपुरकर मामा रमा आणि तिच्या भावडांना मुंबईला आणण्याचा निर्णय घेतात. आणि वणंदगाव सोडून ते काका मामांकडे मुंबईला येतात.
आईवडीलांच्या मृत्यू नंतर रमा ही बालपण हरविलेली मुलगी असते अवघी 8/9 वर्षाची. आईवडिलांना अंतरलेली मूलं अधिक जबाबदार बनतात असं म्हटलं जातं. रमा जबाबदार बनून तिच्या वृत्तीतील अवखळपणा संपविते आणि एकदम प्रोढपणे जगण्यास प्रारंभ करते.रमाईचे  लग्न सुभेदार रामजी यांचे सुपुत्र भिवा यांच्याशी ठरते आणि भायेखेडाच्या भाजीमंडीत रमाई आणि बाबासाहेबांचे लग्न होते आणि एका वणव्यासोबत रमाईचा संसार सुरू होतो. अवघ्या 9 वर्षाच्या रमाईचे लग्न 14 वर्षांच्या बाबासाहेबांसोबत होते. बाबासाहेब रमाला 'रामू' म्हणून हाक मारित. रामू तू आता शिकले पाहिजे असे सांगतांना बाबासाहेब रमाईस क्रांतीबा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची महती सांगून शिक्षणाचे महत्त्व पटवून देतांना म्हणत..
जी च्या हाती पाळण्याची दोरी ती साऱ्या जगाला उध्दारी असे आपण म्हणतो तेव्हा हातात दोरी असलेली बाई शिकलेली असली म्हणजे अगदी अचूक दिशेला झोका देऊ शकेल या शब्दात बाबासाहेब शिक्षणाची महती रमाई स पटवून देत असे. माता रमाई च्या जगण्याकडे आपण बघतो तेव्हा आश्चर्य वाटते आपल्या नवऱ्यावरती संपूर्ण श्रध्दा, संपूर्ण विश्वास ठेवून ही स्त्री जगते आहे. जगण्याविषयीची यत्किंचितही तक्रार न करता तुटपुंज्या मिळकतीत आपला संसार सांभाळत आपल्या पतीला अधिकाधिक कशी मदत करता येईल हा विचार करणारी रमाई आपणास भेटते. रमाईच्या संसारात सुख कमी आणि दुःख आणि जबाबदारीची ओझीच जास्त. बाबासाहेबांचे पुस्तकांविषयीचे अगाध प्रेम आणि समाजाविषयीची तळमळ यामुळे त्यांना कौटुंबिक जीवन जगण्यासाठी तसा वेळच मिळालेला नाही.

सिडनहॅम काॅलेजमध्ये प्राध्यापक असतांना बाबासाहेबांचा साडेचारशे रूपये पगार मिळतो आणि ते पैसा रमाई कडे देतात. साहेब आता संसाराकडे लक्ष देतील या कल्पनेने रमाई खुश होते आणि बाजारात जाऊन साहेबांना बसायला पाट, धोतरजोडी, घरचा किराणा, मूलाबाळांना कपडे अशा सर्व वस्तू घेतात. स्वतःसाठी काही नाही तर सर्व पैसा ती कुटूंबासाठी खर्च करते. नंतर बाबासाहेब रमाई विचारतात, 'रामू पैशाचे काय केले?' रमाई आनंदाने काय काय खरेदी केले ते सांगतात आणि अक्षरशः बाबासाहेब त्यांना रागवितात. रमाईला ते म्हणतात, 'रामू  मला परत एकदा विदेशात जाऊन शिकायचे आहे. आपल्याला याप्रकारे पैसे नाही खर्च करता येणार.' मला आपली आपल्या समाजाची परिस्थिती बदलवायची आहे. समाजाचे ऋण मला फेडायचे आहे.

तू मला मदत करशील ना रामू? आणि मग  50 रूपये बाबासाहेब दर महिन्याला रमाई खर्च करायला द्यायचे.. मग रमाई आपल्या आयुष्यात सुंदर बॅलन्स करायला शिकतात. काय करतात त्या? तर.. 50 रूपयामधील 5 रूपये आणीबाणीचे म्हणजे  काही इमरजन्सी असली तर खर्च करायला वेगळे काढून ठेवत आणि उरलेल्या 45 रूपयाच्या दीड रूपयाप्रकारे वेगवेगळ्या पुड्या बांधून ठेवायच्या आणि रोज एक पुडी याप्रमाणे खर्च करायच्या. खर्च जास्त लागला तर काय? असा कुठल्याही बाबतीत रमाई ला कधी प्रश्नच पडला नाही. गरीबीतही कमी खर्चाने, नेटाने संसार चालविण्याचे 'अर्थकारण' निर्माण करणारी रमा त्या वेळी वित्तमंत्र्याच्या भूमिकेत होती.. नाही का?जे काही पैसे आहेत त्यातच आपले जीवनयापन करणाऱ्या रमाई तेव्हा बुध्दांनी सांगितलेल्या मध्यम मार्गाचा अवलंब केला होता.

बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले त्या काळात रमाई फार हाल झाले. 1913 ते 1917 या चार वर्षात संसाराचा गाडा ती एकटी उचलत होती.  रमाई त्या काळात माहीम, दादर अशा ठिकाणी पायी जाऊन शेणगोळा जमा करायच्या आणि आपला चरितार्थ चालवायच्या. काही महिला रमाईला टोचून बोलायच्या तू एवढी बॅरिस्टराची बायको आणि शेणगोळा जमा करते. गुंजभर सोनेही नाही तूझ्या अंगावर! रमाई अशावेळी शांत राहायची. तीला माहीत होते तीचा पती कुठले अग्निदिव्य पार पाडत आहे म्हणून आयुष्य भर कष्टाच्या अग्नीकुंडात तीने स्वतःला झोकून दिले होते. रमाईच्या वाट्याला जे दुःख ज्या हाल अपेष्ठा आल्यात त्या कुठल्याही स्त्रीच्या वाट्याला येऊ नये. आयुष्य त्या काळात संयम आणि शहाणपणा रमाईला शिकवित होते बाबासाहेब रमाई ला म्हणायचे रमा तू चिंता करू नकोस? तू धीर धर. एकवेळ अशी येईल की लाखो लोकांच्या गळ्यातील दागिना तू बनशील, करोडो लोकांच्या गळ्यातील ताईत तू बनशील.. आणि आज बघा आपण आपली आई रमाईची जयंती साजरी करित आ आहोत ती यासाठीच कारण त्या आपल्या सर्वांच्या गळ्यातील ताईत आहेत म्हणूनच, नाही का!
बाबासाहेब शिकण्यासाठी जेव्हा विदेशात असत तेव्हा रमाई पत्र लिहायची बाबासाहेबांना पण आपल्या जिर्णशिर्ण संसाराची साधी वाच्यताही करायची नाही. स्वतःच्या दोन हातावर अगाढ विश्वास होता तिला आणि तिच्या श्रमाला साथ होती तिच्या नैतिकतेची. परिस्थितीवर मात करण्याचे अचाट बळ रमाई कडे होते.
1923 मध्ये साली बाबासाहेब बॅरिस्टर बनून येतात. खूप लोकं त्यांच्या स्वागताला जातात. रमाई कडे चांगली साडी नसते त्यामुळे काय घालायचे हा प्रश्न तिच्यापुढे निर्माण होतो.. आपल्या जाऊबाई ला वगैरे ती मागू शकली असती पण रमाई स्वाभिमानी. घरची एक ट्रंक त्या उघडतात त्यात शाहूमहाराजांनी सत्कारासाठी दिलेला भरजरी फेटा तीला दिसतो. रमाई तो परिधान करते आणि साहेबांच्या स्वागताला जाते. बाबासाहेब जयजयकार सुरू असतो. हा आनंदोत्सव रमाई कोपर्‍यात उभी राहून बघत असते. बाबासाहेबांची नजर त्यांच्या आवडत्या रामूचा शोध घेते. डोळ्यांनीच रमाई त्या वेळी कृतकृत्य होते. भावनातिरेकाने 'साहेब' हा शब्द रमाईच्या मुखातून बाहेर पडतो. रमाईचे अंतःकरण आनंदाच्या आसवांनी भिजून जाते. तिच्या पुढे साक्षात ज्ञानाचे प्रतिक असलेले बाबासाहेब उभे असतात.. तर असे हे आपले जगावेगळे आईबाबा.

शेवटी राजगृहात रमाई आणि बाबासाहेब राहायला जातात. आता आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी पूर्वी चे कष्ट, पूर्वीची झालेली ससेहोलपट, पूर्वीची रमाईच्या शरीराची झालेली झीज यामुळे रमाई ची प्रकृती दिवसेंदिवस खंगत जाते त्यामुळे हवापालट करण्यासाठी धारवाडच्या विद्यार्थी वसतीगृहाचे प्रमुख वराळे कडे रमाई ला पाठविण्यात येते. या काळात बाबासाहेब परत लंडनला पुढील शिक्षणासाठी जातात. धारवाडच्या मोकळ्या हवेत रमाई ला बरं वाटू लागते. एके दिवशी रमाई च्या लक्षात येते की वसतिगृहाचे स्वयंपाकघर शांत आहे. त्या चौकशी करतात तेव्हा वराळे सांगतात की, 'वसतिगृहाची ग्रॅंट अजून आली नाही. मागची थकबाकी असल्याने वाणी उधार द्यायला ही तयार नाही. स्वयंपाकघरात काहीही शिल्लक नाही. रमाईला खूप वाईट वाटते. आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून त्या वराळेंकडे देते आणि सांगते बांगड्या गहाण ठेवून सर्व सामान आणायला सांगते. त्या दिवशी रमाई स्वतः स्वयंपाक करून मूलांना खाऊ घालते. तर असे सुपाएवढे काळीज असणाऱ्या आपल्या आई होत्या.
एकदा रमाई बाबासाहेबांकडे पंढरपूर ला चलण्याचा आग्रह करतात तेव्हा बाबासाहेब रमाईला समजावतात.. रमा आपण एक नवे पंढरपूर निर्माण करू.. माणसांचे पंढरपूर.. माणसांना माणूस समजणाऱ्याचे पंढरपूर..बुध्दिवादाचं पंढरपूर आपण निर्माण करू तिथे विज्ञाननिष्ठेचा गजर होईल. तिथून समतेचे विचार गावोगावी जाईल. बंधूत्वाचा सुंगध तिथून देशाला मिळेल अस पंढरपूर आपण निर्माण करू. आणि नागपूर ला इथे दिक्षाभूमी निर्माण होते.. आता कुठल्याही पंढरपूर ची गरज आहे का आपल्याला?

1935 मधील मे महिन्यात शेवटी रमाई आजार खूपच विकोपाला जातो. क्षयरोगाने तिचे अंग अंग पोखरलेले असते आणि चंदनाप्रमाणे जळणारी ही आपली आई सर्वांचा निरोप घेते. बहिष्कृतांचा हृदयसम्राट व्याकूळ नजरेने यावेळी रमाई जवळ बसलेला असतो पण रमाईची जीवनयात्रा इतकीच असते.

रमाई किती दुःखे सहन करावीत? लहानपणी आईवडील सोडून जातात. लग्नानंतर सासरे  रामजीबाबा, गंगाधर, इंदू राजरत्न ही मूले मांडीवरच दगावतात.. जगतो कौण? तर फक्त यशवंत. पैशाअभावी ही मूले मरतात. रमाईचे जगणे किती करूण आहे. एका बॅरिस्टराची ही मूले पैशांअभावी मरतात. आज आपल्या समाजातील दृश्य बघतो आपण ज्यांच्याकडे पैसे आहेत ते उधळपट्टी करतात. समाजाशी काहीही देणेघेणे नाही. या जगात फुकट काहीच मिळत नाही. आज जे काही उपभोगतोय ना आपण त्याची किंमत रमाई आणि बाबासाहेबांनी तेव्हा मोजलेली आहे. स्वतःच्या आयुष्याला पणाला लावून त्यांनी आपल्यासाठी हे सारे काही निर्माण केलेले आहे. बाबासाहेबांनी जो प्रंचड वटवृक्ष निर्माण केला त्या वटवृक्षाला धरून ठेवण्याची ताकत आहे रमाई.

बाबासाहेब घडतांना जगाने बघितले असले तरीही त्यांना आयुष्य भर शांतीने आणि सयंमाने साथ देणारी आपल्या देहाला चंदनाप्रमाणे झिजवून तिळतिळ जळणारी रमाई आपल्याला बघता यायला हवी. बाबासाहेब वटवृक्ष बनले असले तरी त्या वटवृक्षाला आधारवड बनून तितक्याच ताकदीने खंबीरपणे मूळांना घट्ट पकडून असणारी रमाई आपण सर्वांना बघता यायला हवी. आपला पती जगावेगळे काम करतोय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहतोय म्हणून सुभेदारांना दिलेला शब्द पाळण्यासाठी बाबासाहेबांना घडविण्यासाठी अहोरात्र झटणारी रमाई आपणास बघता यायला हवी हेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.

Wednesday, 20 December 2023

संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली.

 डेबूजी झिंगरोजी जाणोरकर अर्थात संत गाडगेबाबा यांच्या ६७ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली...! 



 बाबासाहेब आणि गाडगे महाराज यांच्यातील ऋणानुबंधा विषयी हे दोन किस्से वाचा !

 

घटना पहिली..

मुंबईच्या एका पटांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण चालू होते. (बहुधा नरे पार्कातली सभा असावी.) लोक शांतपणे भाषण ऐकत होते. एवढ्यात खडखड करणाऱ्या गाडीचा आवाज आला. आवाज ऐकून बाबासाहेबानी भाषण थांबवले. लोकाना कळेना भाषण का थांबवले ते. बाबासाहेबांनी अचूक हेरलं होतं ते की कोण आलंय… ते होते, गाडगेबाबा…


गाडगेबाबांच्या हातात हार होता. ते मंचाजवळ आले आणि बाबासाहेबांना खाली येण्याची विनंती केली. बाबासाहेब गाडगेबाबाना म्हणाले,

“तुम्ही वर या.”


गाडगेबाबा म्हणाले,

“साहेब तुम्ही खाली या.”


बराच वेळ हे असंच चालू राहीलं. उपस्थितांना कळेना नेमकं चाललंय तरी काय? सरतेशेवटी बाबासाहेबच स्वतः खाली आले. गाडगेबाबांनी बाबासाहेबांच्या गळ्यात हार घातला. दोन्ही महामानवांची गळाभेट झाली. गाडगेबाबा म्हणाले,

“बाबासाहेब, मंचावर येण्याइतका मी मोठा नाही.”


हे शब्द मंच्यावर बसलेल्या लोकानी ऐकले. गाडगेबाबा परतले. बाबासाहेब भाषणासाठी पुन्हा मंचावर येवु लागले आणि मंच्यावर बसलेले लोक हळूहळू खाली उतरू लागले. शेवटी बाबासाहेब एकटेच मंचावरुन भाषण देऊ लागले.


घटना दुसरी…

बाबासाहेब हे संत गाडगेबाबांचा प्रचंड आदर करीत असत. गाडगेबाबा बाबासाहेबांना मानसपुत्र मानत. त्यांच्यातील नातेसंबंध प्रचंड कारुण्याने ओतप्रोत होते. १४ जुलै १९५१ साली गाडगेबाबांची प्रकृती अस्वस्थ असल्याची बातमी बाबासाहेबांना मिळाली. त्यावेळेस बाबासाहेब भारताचे कायदेमंत्री म्हणून कार्यरत होते. सदर बातमी कळताच बाबासाहेब आपलं सर्व कामकाज बाजूला ठेवून गाडगेबाबांच्या भेटीला रवाना झाले. जाताना त्यांनी २ घोंगड्या विकत घेतल्या. कोणाकडून कधीच काही न घेणाऱ्या गाडगेबाबांनी बाबासाहेबांकडून त्या २ घोंगड्या स्वीकारल्या. या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेनंतर दोघांनाही आपापल्या मनात एकमेकांप्रती असलेलं प्रेम अश्रुंवाटे मोकळं केलं होतं..


देव दगडात नसून तो माणसांत आहे असा वैज्ञानिक विचार समाजमनात रुजवत अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे समूळ नायनाट करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या या थोर महामानवास विनम्र अभिवादन…! 

Sunday, 6 August 2023

मैत्री दिनाच्या निमित्ताने...

 *मैत्री दिनानिमित्त....*



गौतम बुद्धांच्या उपदेशानुसार,


चार प्रकारच्या मित्राला कल्याण मित्र समजावे.

1) जो सतत उपकार करणारा सोबती असतो.

2) जो सुखामध्ये आणि दुःखामध्येही साथ देणारा असतो.

3) जो नेहमी मंगलमय सल्ला देणारा असतो.

4) जो हृदयातून कळवळा दाखविणारा व सहानुभूती बाळगणारा असतो.


चार प्रकारे उपकार करणाऱ्या सोबत्याला, कल्याण मित्र आहे असे समजावे.

1) जो मित्र म्हणून अनेक वेळा मित्रास प्रमादापासून, अनेक संकटापासून सावध करीत असतो.

2) जो आपत्ती- विपत्ती पासून मित्रांच्या धन संपत्तीचे योग्य संरक्षण करीत असतो.

3) संकट समयी व दुःखद प्रसंगी जो मित्राचा आधार बनतो, मदत करतो.

4) एखादी जबाबदारी स्वीकारण्याचे वचन दिले असल्यास त्या जबाबदारीची वेळ आल्यावर तो त्याहीपेक्षा दुप्पट मदत करतो व अधिक पटीने जबाबदारी पार पाडतो.


सुख आणि दुःखाच्या प्रसंगी समान भावनेने मित्रासोबत उभा राहून चार प्रकारे जो मदत करतो त्याला कल्याण मित्र ओळखावे.

1) त्याला माहित असलेली गोपनीय माहिती आगोदरच सांगत असतो.

2) त्याची स्वतःबद्दलची काही गोपनीय माहिती असेल तर तो मित्राजवळ सांगून ठेवतो.

3) मित्रावर ओढवलेल्या संकटाप्रसंगी, आपत्ती-विपत्ती प्रसंगी तो मुद्दाम त्याची साथ सोडत नाही, धैर्याने सोबत उभा राहतो.

4) वेळप्रसंगी स्वतःचे जीवदान देखील तो मित्राच्या संकटप्रसंगी अर्पण करीत असतो.


मित्राचा हितचिंतक म्हणून जो चार प्रकारे हिताचा सल्ला देतो त्याला कल्याणमित्र ओळखावे.

1) जो मित्राला वाईट व्यसनांपासून व दुष्कृत्यांपासून नेहमी परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना वाईट कृत्य करू देत नाही.

2) जो मित्राला नेहमी सत् कार्य करण्याकरिता प्रेरित करतो, चांगल्या कार्यकरिता प्रोत्साहन देत असतो.

3) ज्या गोष्टीची मित्राला जाणीव नसेल, त्याने ज्या ऐकल्या नसतील अशा हितकारक गोष्टींची जो माहिती देतो.

4) दुःख मुक्ती करणाऱ्या परम् सुख शांतीमय निर्वाणाच्या मार्गाचे जो पथ प्रदर्शन करतो.


मित्रत्वाच्या सद् भावनेने जो चार प्रकारे कळवळा व्यक्त करतो त्याला कल्याण मित्र ओळखावे.

1) मित्रावर ओढवलेल्या संकट प्रसंगी जो कधीही आनंदित होत नाही.

2) मित्राच्या उत्कर्षामध्ये, प्रगतीमध्ये जो नेहमी आनंदित होत असतो व मनाने पून्हा प्रगतीची मंगलकामना करतो.

3) मित्राबद्दल दुसरे कोणीही मागे किंवा पुढे वाईट बोलत असतील, त्यावेळी जो त्यांना वाईट बोलण्यापासून रोखीत असतो.

4) मित्राबद्दल दुसरे कोणीही मागे किंवा पुढे चांगले बोलत असतील अशांची जो प्रशंसा करतो.


या प्रकारे तथागत बुद्ध पुन्हा म्हणाले...

सुख दुःखामध्ये जो साथ देणारा असतो, जो हित चिंतक म्हणून नेहमी हित-सुखाचा सल्ला देतो, सद्भावनेने वागवणारा व नेहमी मित्रावर जो अनुकंपा तथा उपकार करणारा असतो अशा चार प्रकारच्या मित्रांना बुद्धिमान माणसाने कल्याण मित्र ओळखावा व 

माता ज्याप्रमाणे आपल्या एकुलत्या एक मुलाचे त्याग व सेवा भावनेने संरक्षण करते त्या प्रकारे कल्याण मित्राचे, बुद्धिमान सभ्य माणसाने संगोपन करावे.


संदर्भ: सिगालो वाद सुत्त

संकलन: उपासक