संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

गाडगेबाबा कोणत्याही शाळेत शिकले नाहीत तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर उच्च विद्याविभूषित. पार परदेशातून शिकून आलेले. असा स्पष्टपणे दिसणारा विरोधाभास असतानाही या दोन महामानवांमध्ये मात्र कमालीचे सख्य होते. यामागे कारणीभूत होता तो समाजाविषयीचा जिव्हाळा, तसेच समाजाच्या शोषणाला कारणीभूत अशा अनिष्ट प्रथा-परंपरांना नाहीसे करण्याची तगमग. दीन-दुबळ्यांच्या कल्याणासाठी राबणारे हे दोन्ही महामानव समाजप्रबोधनासाठी अनेकदा एकत्र आले आहेत. जाती व्यवस्थेतील उच्च-नीच भाव हाच समाजाच्या सर्वांगीण शोषणासाठी कारणीभूत आहे याविषयी दोघांचेही एकमत होते. सर्व प्रकारचे शोषण संपून समताधिष्ठित समाज निर्माण व्हावा यासाठी जन प्रबोधन आवश्यक आहे, हे दोघांनाही मान्य होते. आपल्या प्रबोधनाचे माध्यम म्हणून कीर्तन या लोककलाप्रकाराचा स्वीकार गाडगेबाबांनी केला, तर भाषणे, चर्चा, आंदोलने, राजकारण. धर्मकारण इ. माध्यमे आपल्या उद्दिष्टपूर्तीकरिता बाबासाहेबांनी वापरलीत. सामाजिक व आर्थिक सत्ता सर्वसामान्यांच्या हाती आली पाहिजे असे दोघांनाही वाटत होते. त्यामुळे स्वाभाविकपणे दोघेही एकमेकांच्या कार्याला पूरक असेच उपक्रम करीत राहिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा वयाने पंधरा वर्षे मोठे असूनही आपल्या मोठेपणाचा बडेजाव कधीही गाडगेबाबांनी दाखविला नाही. उलट बाबासाहेबांच्या विद्वत्तेविषयी आणि कार्याविषयी गाडगेबाबांना अतीव आदर होता. तसेच बाबासाहेबांचेही होते. गाडगेबाबा अशिक्षित आहेत हे त्यांनी कधीही आपल्या वागण्यातून दिसू दिले नाही. उलट ते अगदी खाली बसून त्यांच्या कीर्तनामध्ये सहभागी होत असत. आपल्या कार्याविषयी एकमेकांचा सल्ला व मार्गदर्शन ते घेत असत. आपल्या कीर्तनामधून गाडगेबाबा बाबासाहेबांविषयी आदराने बोलत तसेच त्यांच्या विचार व कार्याचा आवर्जून
उल्लेख करीत असत. गाडगेबाबांचे कीर्तन मुंबईत आहे असे कळले की, बाबासाहेब आवर्जून त्यांचे कीर्तन ऐकायला जात असत आणि आपल्या मित्रांना तसेच सहकाऱ्यांनाही त्यासाठी प्रोत्साहित करीत असत. गाडगेबाबांच्या कीर्तनातून आपणास काय शिकायला मिळेल याची उत्सुकता त्यांना होती. एकदा मुंबईच्या भायखळा येथील मार्केटमध्ये बाबांचे कीर्तन होते. वि.मा.दि. पटवर्धन यांनी याविषयीची आपली आठवण लिहून ठेवली आहे. ते म्हणतात, 'डॉ. आंबेडकरांच्या आग्रहाखातर एकदा त्यांच्याबरोबर विविध वृत्तपत्रांचे संपादक आणि मी बाबांच्या कीर्तनाला गेलो. भायखळा मार्केट जे नेहमी घाणेरडे असायचे ते आज लख्ख होते.' सालं या म्युनिसिपालटीच्या लोकांना कीर्तनासाठी पटांगण साफ करायला बरं सुचत नाही तर के.इ.एम.चं आवार बघा कधी त्याला झाडू लागेल तर शपथ.' रामभाऊ आपल्या स्वभावानुरूप चरफडले आणि रुमाल टाकून त्यावर बसणार, तोच बाबासाहेबांनी तो रुमाल ओढून घेतला आणि म्हणाले,' रामभाऊ, हे मार्केट बाबांनी स्वतःच्या हातांनी झाडून धुवून काढलं. बसा नीट आरामात. बाबाच्या कीर्तनात बाबासाहेब खालीच बसायचे आणि म्हणायचे,' जेथे गाडगेबाबा तेथे घाण असूच शकत नाही.' बाबासाहेबांमुळे त्यांचे सहकारीही खालीच बसून गाडगेबाबांचे कीर्तन ऐकत असत.
कीर्तन सुरू होताच तटणीस नावाच्या एका श्रोत्याने बाबांना विचारले, महाराज, एक विचारू का ?' त्यावर गाडगेबाबा म्हणाले,' इचारा मायबाप ! पन मले महाराज म्हणू नका. मी आपलं लेकरू हाय. बोलविते धनी बसले तुमच्या पलीकडे, तेच आहेत खरे महाराज, गरीब लोकांसाठी. आपल्या समाजासाठी लढणारे महाराज तुमच्यासाठी आधीच जमिनीवर खाली बसून माह्य कीर्तन आयकून राहिले.' असे म्हणून त्यांनी बाबासाहेबांकडे बोट दाखविले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की, बाबासाहेब खाली बसून गाडगेबाबांचे कीर्तन ऐकत होते.
गाडगेबाबांना बाबासाहेबांविषयी असलेला आदर अनेक प्रसंगांमधून दिसून येतो. बाबासाहेबांविषयी कुणी अनादर व्यक्त केला की, गाडगेबाबा अस्वस्थ होत असत. बाबासाहेबांचा जीवनप्रवास, संघर्ष, शिक्षण व इतर कार्य याविषयी आपल्या कीर्तनांमधून ते नेहमी सांगत असत. त्याचबरोबर त्यांच्या नावाचा जयघोष आपल्या श्रोत्यांना करायला लावीत असत. १९४२ मध्ये असाच एक प्रसंग घडला. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे तात्यासाहेब पवार यांच्या बंगल्यासमोर आयोजित कीर्तनाच्या वेळी भारतातील अनेक महामानवांच्या कार्याविषयी महती सांगताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे महत्व सांगून कीर्तन संपताना' बोलो डॉ. बाबासाहेब आंबेडकर की..' असा जयघोष केला. परंतु श्रोत्यांकडून त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी अस्वस्थ होऊन बाबा पुन्हा बाबासाहेबांच्या जीवनप्रवास, कार्य व संघर्षाविषयी पोटतिडकीने सांगू लागले. बाबांच्या या तळमळीचा योग्य तो परिणाम होऊन त्यांनी पुन्हा बाबासाहेबांचा जयघोष केल्यावर लोक त्यांच्यामागून मोठ्या आवाजात 'जय' म्हणू लागले. सगळीकडे झालेल्या बाबासाहेबांच्या प्रचंड जयघोषाने सारा आसमंत निनादला. जसा गाडगेबाबांना बाबासाहेबांविषयी आदर होता, तसाच बाबासाहेबांनाही गाड्ङ्गेबाबांबद्दल होता,
एकदा मुंबईच्या नरे पार्कात डॉ. आंबेडकरांचे भाषण सुरू होते. लोक शांतपणे बाबासाहेबांचे भाषण ऐकण्यात तल्लीन झाले असतानाच गाडगेबाबांच्या गाडीचा खडखड आवाज आला. तो ओळखीचा आवाज ऐकून बाबासाहेबांनी आपले भाषण थांबविले. लोकांना कळेना की, बाबासाहेबांनी आपले भाषण का थांबविले म्हणून. मंचाखाली गाडगेबाबा आपल्या हातात हार घेऊन उभे होते व बाबासाहेबांना खाली येण्याची विनंती करीत होते. ते पाहून बाबासाहेब त्यांना म्हणाले,' तुम्हीच वर या.' त्यावर गाडगेबाबा म्हणाले,' साहेब तुम्ही खाली या.' बराच वेळ असंच चालू राहिलं. श्रोत्यांनाही हे काय चालू आहे हे कळेनासे झाले. शेवटी बाबासाहेब मंचावरून खाली उतरले. गाडगेबाबांनी त्यांच्या गळ्यात हार घातला. दोन्ही महामानव अशारितीने जाहीरपणे एकमेकांना भेटले.
गाडगेबाबा यावेळी बाबासाहेबांना म्हणाले की,' मंचावर येन्याएवढा मी काही मोठा नाही.' लोकांनी हे शब्द ऐकले. बाबासाहेब पुन्हा भाषण देण्याकरिता मंचावर जायला निघाले, तेव्हा मंचावर बसलेले लोक हळुहळू मंचावरून खाली उतरले. शेवटी मंचावर एकटेच बाबासाहेब होते. या दरम्यान गाडगेबाबा तेथून निघून गेले होते. बाबासाहेबांनी पुन्हा आपल्या भाषणास सुरुवात केली, अशी दोघांमधील मैत्री अतूट होती.
मुंबईच्या बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये ८ नोव्हेंबर १९५६ रोजी झालेल्या कीर्तनात डॉ. आंबेडकरांच्या शिक्षणाची गोष्ट सांगताना गाडगेबाबा म्हणाले होते की, 'विद्या केवढी मोठी गोष्ट आहे. डॉ. आंबेडकर साहेब यांच्या पिढ्यान पिढीनं झाडू मारायचं काम केलं. त्याइच्या वडीलाले बुद्धी सुचली अन डॉ. आंबेडकर सायबाले शाळेत टाकलं. आंबेडकर सायबानं काही लहानसहान कमाई नाही केली. त्यांनी घटना केली, हिंदुस्थानची घटना केली. अन तेच शाळेत जाते ना, अन शिकते ना, तर झाडू मारनंच त्याईच्या कर्मात होतं. विद्या मोठं धन आहे. जेवणाचं ताट मोडा, बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या, मोडक्या घरात राहा. पण मुलाले शिक्षण दिल्याविने सोडू- नोका !'
डॉ. आंबेडकर ज्या समाजातून आले होते, तो समाज हिंदू धर्मातील अस्पृश्य मानला गेलेला समाज होता. म्हणून मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी, हिंदू म्हणून मरणार नाही; अशी प्रतिज्ञा त्यांनी नाशिक जिल्ह्यातील येवले येथे १९३५ ला जाहीर कार्यक्रमात केली व हिंदू धर्म त्यागाची घोषणाही केली. त्यानंतर अनेक धर्माचे लोक त्यांना भेटून आपल्या धर्मात येण्याची विनंती करू लागले. या दरम्यान डॉ. आंबेडकर गाडगेबाबांच्या भेटीस आवर्जून गेले होते. त्यांच्याशी धर्म स्वीकारण्याविषयी त्यांनी सल्ला-मसलत केली. बाबांना भेटल्यावर डॉ. आंबेडकर म्हणाले,' आमचं आपल्याशी काम होतं.' त्यावर बाबा म्हणाले,' बाबासाहेब आपणास तरास झाला. आपण किती तरास घेता. भारताची घटना बनवली, चहूकडे विद्येचा प्रकाश पाडला, दलितांसाठी रात्रंदिवस खटपट करून राहिले. धन्य...आपले माता-पिता !' हे ऐकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना हात जोडून म्हणाले बाबा आपण माझे गुरू आहात. एका बाबतीत मला आपला सल्ला पाहिजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या वाक्यावर बाबा म्हणाले,' बोला ! मले अडाण्याले काय समजते ?' बाबांच्या या वाक्यावर डॉ. आंबेडकरांनी आपल्या हिंदू धर्म त्यागाच्या निर्णयाविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे नव्या धर्माच्या स्वीकाराविषयीही त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी बाबा त्यांना म्हणाले,' मले अडाण्याले काय धर्माचं ज्ञान ? मी अडाणी धोबी !'
बराच काळ त्यांच्यात विचारांची देवाण-घेवाण होत होती.
थोड्या वेळाने बाबा म्हणाले,' डॉक्टर साहेब, मी अडाणी माणूस ! तुम्ही शिकले-सवरले हायेत.लय बुकं वाचली हायेत. तुम्हाले आपल्या समाजाची दुःख दैना माहित आहे. तुम्ही जो निर्णय घ्यान तो बेसच अशीन. सगळी पद दलित जमात तुमच्या मागे आहे. तुम्ही रस्ता दाखवान त्या रस्त्यानं ते सगळे येतीन. त्याईची तुमच्यावर श्रद्धा हाये. तुमच्या एका अक्षरापायी हे लोक जीव टाकतीन, त्याईले भलत्या वाटेनं नेऊ नोका. बुद्ध अन त्याचा धरम माणुसकीचा धरम हाये. आम्ही बाप्पा वारकरी धर्माचे. ह्याच धरम माणुसकीनं साऱ्या समजाले पुढं नेईन. तुम्ही करान थे बराबरच करान, सारा समाज तुमच्या पाठीशी हाये.'
या संवादामधून गाडगेबाबांनी बौद्ध धर्माच्या स्वीकाराची सूचना बाबासाहेबांना दिली होती हे दिसून येते. दोघांच्या विचारांमध्ये कमालीचे साधर्म्य होते. कोणतीही औपचारिकता न पाळता दोघांनी आपापली मने एकमेकांसमोर खुली केलीत.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारताचे पहिले मंत्रिमंडळ गठित केले गेले. त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदेमंत्री म्हणून समावेश झाला. त्यानंतरही मुंबईत बाबा आले असे कळले की, व्यस्त असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाबांना भेटायला येत असत. प्रकृती बिघडल्यामुळे १४ जुलै १९५१ रोजी गाडगेबाबा मुंबईला दादर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखत
झाले होते. महानंद स्वामी यांच्याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ही माहिती कळली. त्याच दिवशी संध्याकाळी बाबासाहेबांना दिल्लीला जायचे होते. त्यासाठी ते बॉम्बे सेन्ट्रल रेल्वे स्टेशनवर पोहोचले सुद्धा होते. परंतु, बाबांच्या प्रकृतीची माहिती कळल्यावर त्यांनी आपला बेत बदलविला व गाडगेबाबांच्या भेटीसाठी दवाखान्यात पोहोचले. बाबांना भेट देण्यासाठी त्यांनी सोबत दोन घोंगड्या खरेदी केल्या होत्या. गाडगेबाबा कुणाकडूनही कोणतीही भेट स्वीकारीत नसत. पण बाबासाहेबांनी प्रेमाने आणलेल्या घोंगड्या मात्र त्यांनी स्वीकारल्या. त्यावेळी ते म्हणाले,' डॉक्टर साहेब तुम्ही कशाला आले ? मी एक फकीर, तुमचा एक एक मिनिट महत्वाचा आहे. तुमचा अधिकार किती मोठा आहे.' बाबांचे ते म्हणणे तन्मयतेने ऐकणारे बाबासाहेब म्हणाले,' बाबा माझा अधिकार दोन दिवसांचा उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे.'
याप्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांमधून सुखद अश्रू तरळले होते. इतका निवांतपणा पुन्हा लाभणार नाही आणि अशा भेटी होणार नाहीत, याची जाणीव दोघांनाही झाली असावी. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील हे उपस्थित होते. निघताना बाबासाहेबांनी बाबांना तब्येतीला जपा, धर्मशाळा आणि इतर कामाची काळजी करू नका; ते केव्हाही पुढे करता येईल. आपण विश्रांती करा असे बाबांना आवर्जून सांगितले. याच भेटीमध्ये बाबांनी डॉ. आंबेडकरांना पंढरपुरातील चोखामेळा धर्मशाळा पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक कामासाठी दिली आणि पंढरपूर धर्मशाळेचे दानपत्र व धर्मशाळेच्या खात्यात असलेली एकूण १५००० रुपये इतकी रक्कम सुपूर्द केली. निरोप घेताना डॉ. आंबेडकरांना गाडगेबाबा म्हणाले की, आपली लय आधी भेट झाली असती तर धर्मशाळा काढण्याऐवजी शिक्षण शाळा काढल्या असत्या. पण आता हे काम तुम्हीच करा. मला हे उशिरा समजले की, अशा लय शाळा अन कालिजाची गरज आहे. बाबांच्या मनातील शिक्षण प्रसाराची इच्छा या निमित्ताने पूर्ण झाली. अंगात ताप असतानाही गाडगेबाबांनी कागदपत्रांवर अंगठा दिला, असे या घटनेविषयी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
लिहून ठेवले आहे. शिक्षणामुळेच माणसाला मोठेपण मिळते है बाबासाहेबांवरून बाबांनी जाणलं होतं. डॉ. आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्यामध्ये वैचारिक साम्य होते हे यावरून दिसून येते.
गाडगेबाबांचा मुलगा गोविंद कुत्रा चावल्यामुळे झालेल्या विषबाधेने मरण पावला होता. तशीच त्यांची आईही मरण पावली होती. त्यावेळीही जेवढे दुःख बाबांना झाले नव्हते, तेवढे बाबासाहेबांच्या मृत्यूमुळे झाले होते. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब गेले हे कळताच बाबा धाय मोकलून रडले होते. त्यांचे रडणे पाहून सोबतच्या लोकांना काही कळेना तेव्हा बाबा म्हणाले,'अरे आज तुमचा आमचं बाप या जगात राहिला नाही. अरे तुम्ही आम्ही पोरके झालो रे !' त्यानंतर बाबांची प्रकृती ढासळत गेली आणि अवघ्या चौदा दिवसांमध्ये त्यांचीही प्राणज्योत मालवली. २० डिसेंबर १९५६ रोजी बाबा जे जग सोडून गेले. अमरावतीला येताना वलगाव येथील पेढी नदीच्या पुलावर मोटारीत असतानाच त्यांना मृत्यू आला....
-उपासक